रत्नागिरी : येथील
आविष्कार संस्थेच्या श्यामराव भिडे कार्यशाळेच्या दहा दिव्यांग विद्यार्थ्यांनी विमानतळ परिसरातील भारतीय तटरक्षक दलाच्या कार्यालयात जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. याच विद्यार्थिनींनी जहाजांवर समुद्रसीमेचे संरक्षण करणाऱ्या जवानांसाठीही राख्या पाठविल्या आहेत.
या वेळी कार्यशाळेच्या प्राची पाटील व बोराडे या शिक्षिकांनी कार्यशाळेच्या कार्याबद्दल जवानांना माहिती दिली. कार्यशाळा १८ वर्षांवरील दिव्यांग विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देत असून, आतापर्यंत ८० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. संस्थेत अठरा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. मेणबत्त्या, अगरबत्त्या, फाइल्स, पर्स, कृत्रिम दागिने, राख्या आदी वस्तू बनविण्याचे, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये यशस्वितेसाठी येथे प्रशिक्षण दिले जात असल्याचे पाटील यांनी सांगितले.
भारतीय तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर, कमांडंट एस. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे कौतुक केले. ‘दिव्यांग विद्यार्थ्यांनी केलेली कामगिरी जवानांसाठी प्रेरणादायी आहे. देशवासीयांचे संरक्षण करताना सार्थ अभिमान आहे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज संचालित मुकुल माधव विद्यालयाच्या पाच विद्यार्थिनींनीही जवानांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या वेळी विद्यालयाच्या अधीक्षक राधा करमरकर, शाळेचे रजिस्ट्रार व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. ‘कन्याकुमारी ते जम्मू काश्मीरपर्यंतचे जे जवान रत्नागिरीत कार्यरत आहेत, त्यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांनी जो जिव्हाळा व प्रेम दिले, त्यामुळे आम्ही व आमचे जवान कृतकृत्य झालो,’ अशी भावना कमांडंट पाटील यांनी व्यक्त केली.
(‘आविष्कार’ या संस्थेच्या कार्याविषयी सविस्तर माहिती देणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘गुरुकुल’च्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरीतील मूकबधिर विद्यालयात जाऊन रक्षाबंधन साजरे केले, त्याबद्दलची सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)